नांदेड, दि. 11 नोव्हेंबर: (प्रतिनिधी) माधव वाघमारे
राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 साठी अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यातील देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगाव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड आणि लोहा/हिमायतनगर या नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान, तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे.
या सर्व नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रात 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक काळात नागरिक, अधिकारी, राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी कोणते नियम पाळावेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे—
✅ काय करावे
- चालू असलेल्या योजना व कार्यक्रम सुरु ठेवता येतील; शंका असल्यास जिल्हाधिकारी/आयुक्त किंवा राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घ्यावी.
- आपत्ती, पूर, साथीचे रोग अशा परिस्थितीत मदत व पुनर्वसनाची कामे सुरु ठेवता येतील.
- सार्वजनिक सभा, हेलिपॅड, मैदान सर्व पक्षांना निःपक्षपातीपणे उपलब्ध करून द्यावीत.
- सभांसाठी व मिरवणुकांसाठी पोलिस व प्रशासनाची परवानगी आवश्यक; वेळ, ठिकाण व मार्ग आधी ठरवावा.
- ध्वनिक्षेपक (Loudspeaker) वापरण्यापूर्वी परवानगी घ्यावी.
- सभांमध्ये शांतता राखावी; अडथळे निर्माण करणाऱ्यांविरुद्ध पोलिस मदत घ्यावी.
- मतदानाच्या दिवशी सर्व नियमांचे पालन करून वाहन वापर आणि ओळखपत्रांची खात्री करावी.
- सर्व अधिकाऱ्यांच्या व निवडणूक आयोगाच्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे.
❌ काय करू नये
- शासकीय वाहने, कर्मचारी किंवा यंत्रणा प्रचारासाठी वापरू नयेत.
- सरकारी निधीचा वापर जाहिरात, उद्घाटन, कोनशिला बसविणे किंवा विकास कामांच्या घोषणेसाठी करू नये.
- तदर्थ नियुक्त्या, आर्थिक लाभ किंवा सवलती जाहीर करणे वर्ज्य.
- मतदारांना लाच, प्रलोभन, जातीय वा धार्मिक आवाहन करणे गुन्हा आहे.
- इतर पक्षांवर वैयक्तिक किंवा अप्रमाणित आरोप करणे टाळावे.
- प्रार्थनास्थळांचा वापर प्रचारासाठी करणे निषिद्ध.
- मतदान केंद्राजवळ प्रचार साहित्य, ध्वज, चिन्हांचे प्रदर्शन करू नये.
- ध्वनिक्षेपकांचा वापर सकाळी 6 ते रात्री 10 नंतर करू नये; परवानगीशिवाय वापर बेकायदेशीर.
- मद्य, पैसा, वस्तूंचे वाटप करणे, मतदारांवर दबाव टाकणे, खोट्या नावाने मतदान करणे हे निवडणूक अपराध आहेत.
- इतर पक्षांच्या सभांमध्ये अडथळा निर्माण करू नये; पोस्टर किंवा फलक फाडू नयेत.
राज्य निवडणूक आयोगाने सर्व उमेदवार, राजकीय पक्ष आणि नागरिकांना आवाहन केले आहे की,
“निवडणूक प्रक्रिया शांतता, पारदर्शकता आणि कायद्याच्या चौकटीत पार पाडावी.”












