नांदेड:२५ मार्च प्रतिनिधी माधव वाघमारे
जिल्ह्यात गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही वर्तनात सुधारणा न करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध आता थेट तडीपारीचे अस्त्र उगारले जात आहे. पोलीस अधीक्षक अभिनश कुमार यांच्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत सिधखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार किशोर प्रेमसिंग राठोड याला नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांतून पाच महिन्यांकरिता हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
सिंधखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे सारखणी (ता. किनवट) येथील रहिवासी किशोर प्रेमसिंग राठोड याच्यावर विनयभंग, शिवीगाळ, मटका, जुगार आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा प्रस्ताव सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला होता.
प्रशासकीय कारवाईचा बडगा
उपविभागीय अधिकारी (माहूर) किरण भोंडवे यांच्यामार्फत हा अहवाल सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी (किनवट) जेनीत दोन्तुला यांच्याकडे सादर करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५६(१)(ब) अन्वये सदर गुन्हेगाराला तीन जिल्ह्यांतून ५ महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश २४ मार्च २०२६ रोजी निर्गमित करण्यात आले.
वरिष्ठांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (माहूर) किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सिंधखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव व प्रतिबंधक कारवाई पथकाने या प्रकरणाचा यशस्वी पाठपुरावा केला.
या तडीपारीच्या आदेशामुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन कठोर पावले उचलत असल्याचे स्पष्ट झाले आहे.












