नांदेड : १९ जानेवारी (प्रतिनिधी माधव वाघमारे)
श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होणार असून, या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी देश-विदेशातून ८ ते १० लाख भाविक नांदेडमध्ये दाखल होतील, अशी माहिती आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिली. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक आयोग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने नांदेड येथे “हिंद की चादर” या संकल्पनेवर आधारित श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५०व्या शहिदी समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड हे सिख धर्मातील पवित्र तख्त “हजूर साहिब” असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे आयुक्त पापळकर यांनी सांगितले.
या भव्य समागमास देशाचे गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री व मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली. सामाजिक एकोपा, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम भव्य-दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी तब्बल ५२ एकर क्षेत्रावर भव्य मंडप उभारण्यात येणार असून, नांदेड टेंट सिटी, ३५० स्टॉल्स, भाविकांसाठी निवास, भोजन व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आठ ते दहा ठिकाणी लंगर व्यवस्था, पिण्याचे पाणी, अंतर्गत दळणवळण यासाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सांगितले की, देशभरातून भाविक व मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित असल्याने ५ विशेष विमानसेवा व ५ विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक यांनी नांदेड, नागपूर व मुंबई येथे समन्वय साधण्यात आल्याची माहिती दिली. दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील मोदी ग्राउंडवर हा भव्य कार्यक्रम होणार असून, संत-महंत, विविध धर्मगुरू, मान्यवर आणि लाखो भाविक उपस्थित राहतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.












