नांदेड, दि. 30 डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. एखाद्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित केंद्राची मान्यता रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट आणि ठाम इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी दिला.
मागील वर्षी 2025 मध्ये झालेल्या परीक्षांतील अनुभव लक्षात घेता यंदा अधिक काटेकोर नियोजन व अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फेब्रुवारी/मार्च 2026 च्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांची संयुक्त पूर्वतयारी आढावा बैठक आज मातोश्री प्रतिष्ठाण इंजिनिअरिंग कॉलेज, खुपसरवाडी (ता. जि. नांदेड) येथे पार पडली. ही बैठक विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकररावजी तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस विभागीय मंडळाच्या प्रभारी सचिव श्रीमती अनुपमा भंडारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) माधव सलगर, शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे, संस्थेचे अध्यक्ष कामाजी पवार व सचिव श्री. चारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 2025 च्या परीक्षांदरम्यान काही परीक्षा केंद्रांवर आढळलेल्या अव्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “परीक्षार्थ्यांना बसण्यासाठी ड्युअल डेस्क नसणे, कंपाऊंड वॉलचा अभाव, बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी – त्यामुळे ही दहावी-बारावीची परीक्षा आहे की जत्रा, असा भास होतो,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासन व केंद्रप्रमुखांना खडसावले.
2026 च्या परीक्षांपूर्वी सर्व परीक्षा केंद्रांनी आवश्यक भौतिक सुविधा पूर्ण कराव्यात, असे निर्देश देताना त्यांनी ड्युअल डेस्क, सीसीटीव्ही, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, पंखे, लाईट, रॅम्प व कंपाऊंड वॉल या सुविधा अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले. या सुविधा उपलब्ध नसल्यास संबंधित परीक्षा केंद्र बंद करण्याची शिफारस करण्यात येईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडल्यास किंवा त्यास कुठल्याही प्रकारे प्रोत्साहन दिल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. “कॉपी करून उत्तीर्ण होणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. अशा मार्गाने यश मिळवलेला विद्यार्थी भविष्यात चांगला नागरिक घडत नाही,” असे मत व्यक्त करत त्यांनी सर्व शिक्षक, केंद्रप्रमुख व प्रशासनाने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे, असे आवाहन केले.
आजच्या शिक्षण पद्धतीत अंतर्गत मूल्यांकनाचे 20 गुण असून लेखी परीक्षेत 80 पैकी केवळ 15 गुण आवश्यक आहेत. वर्षभरात विद्यार्थ्यांना ही किमान तयारी करून परीक्षा देता येत नसेल, तर त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. त्यामुळे यंदाच्या परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार सहन केला जाणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
यावेळी विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकररावजी तेलंग यांनी मंडळाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती देताना अपार आयडी, खाजगी विद्यार्थ्यांचे अर्ज, अतिविलंब शुल्काच्या तारखा तसेच कॉपीमुक्त अभियानाची पूर्वतयारी याबाबत मार्गदर्शन केले. गैरप्रकाराला प्रोत्साहन दिल्यास कोणाचाही फायदा होत नाही, उलट सर्वांचेच नुकसान होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षणाधिकारी माधव सलगर व दिलीपकुमार बनसोडे यांनीही कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष कामाजी पवार यांनी प्रस्ताविकातून संस्थेच्या कार्याचा व विविध अभ्यासक्रमांचा आढावा घेतला.
या सहविचार सभेस जिल्ह्यातील 11 तालुक्यांतून सुमारे 635 मुख्याध्यापक व प्राचार्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विभागीय मंडळ, लातूर येथील सहायक अधीक्षक श्री. वैद्य यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी सहायक शिक्षण उपनिरीक्षक हनुमंत पोकले यांनी विशेष परिश्रम घेतले, तर संस्थेचे प्रतिनिधी श्री. किनेकर यांनी पूर्वनियोजन केले.
यापूर्वी 27 डिसेंबर 2025 रोजी शिवनेरी पोदार लर्न स्कूल, बिजूर (ता. बिलोली) येथे पाच तालुक्यांची संयुक्त बैठक पार पडली होती. त्या बैठकीस 217 मुख्याध्यापक व प्राचार्य उपस्थित होते.












