नांदेड, 23-: स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान स्वच्छता ही सेवा पंधरवडा सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी “महाश्रमदान : एक दिवस, एक तास, एक साथ” हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सर्व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले आहे.
या महाश्रमदानाचा कालावधी सकाळी 8 ते 9 असा असणार असून प्रत्येक गावातून एकत्रित स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, पत्रकार, समाजसेवक, जलसुरक्षक, महिला बचत गट आदी सर्व घटकांचा सहभाग अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
या अंतर्गत जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, रेल्वे स्थानके, घाट-नाले, धार्मिक व पर्यटन स्थळे, ऐतिहासिक वास्तू, शैक्षणिक संस्था, बाजारपेठा, कार्यालयीन व ग्रामपंचायत आवार येथे महाश्रमदानाव्दारे स्वच्छता करण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्यासह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमित राठोड व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब यांनी जिल्ह्यातील ग्रामस्थांना उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.












