(प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड, दि. ९ जानेवारी — शीख धर्माचे नववे गुरु, धर्मस्वातंत्र्य व मानवतेसाठी बलिदान देणारे श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दिनांक २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य व ऐतिहासिक “हिंद-दी-चादर” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम केवळ धार्मिक नसून सर्वधर्मीय ऐक्य, सामाजिक समरसता व संविधानिक मूल्यांचा जागर करणारा ठरणार असून तो ऐतिहासिक करण्यासाठी सर्व समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मान्यवरांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केले.
सचखंड पब्लिक स्कूल येथील गुरु ग्रंथ साहिब भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर नांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी, संत ज्ञानी हरनाम सिंगजी, भाई जोसिंदर सिंगजी, भाई राम सिंगजी, भाई कश्मीर सिंगजी, भाई गुरमीत सिंगजी, गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी, समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग, सरजीत सिंग गिल, राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, महेंद्र रायचूरा (धर्म जागरण क्षेत्रीय प्रमुख – पश्चिम क्षेत्र), महंत सुनिल महाराज, महंत जितेंद्र महाराज, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक किशनराव राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग, राज्यस्तरीय समिती तसेच शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी, उदासीन, भगत नामदेव (वारकरी संप्रदाय) व इतर सर्व समाजांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य कार्यक्रम नांदेड शहरातील मोदी मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी व संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी “हिंद-दी-चादर” या संकल्पनेचे महत्त्व विशद करत गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मिळणारा मानवता, धार्मिक स्वातंत्र्य व सर्वधर्म समभावाचा संदेश अधोरेखित केला. महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासन व विविध समाजांच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यापक व काटेकोर तयारी सुरू आहे. भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी २५ विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक बाबीवर नियोजनबद्ध काम सुरू आहे.
भाविकांसाठी जिल्हानिहाय पार्किंग व्यवस्था, निवासासाठी शाळा, महाविद्यालये व मोकळ्या जागांची उपलब्धता, सुसूत्र वाहतूक व्यवस्था, रेल्वे विभागाच्या सहकार्याने अतिरिक्त सुविधा, लंगर, पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य सेवा यांचा दैनंदिन आढावा घेतला जात आहे. कार्यक्रमस्थळी वैद्यकीय स्टॉल उभारण्यात येणार असून आपत्कालीन सेवाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
तसेच प्रचार-प्रसिद्धीसाठी शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून १५ जानेवारीपासून प्रभातफेऱ्या काढून जनजागृती करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले की, शहीदी समागम हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो संविधानिक मूल्ये, सामाजिक ऐक्य व मानवतेचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रम आहे. या उपक्रमाची सुरुवात नागपूर येथे यशस्वीरीत्या झाली असून नांदेड येथील दोन दिवसीय कार्यक्रम हा त्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री व मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नांदेडच्या भूमीतून सर्वधर्मीय ऐक्याचा जागर घडवणारा “हिंद-दी-चादर” कार्यक्रम ऐतिहासिक ठरावा यासाठी सर्व समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी शेवटी केले.












