नांदेड ८ एप्रिल प्रतिनिधी
नांदेड शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून, एका गंभीर वादाच्या घटनेनंतर जखमीला उपचारासाठी नेले जात असताना प्रत्यक्ष रुग्णालय परिसरातच पुन्हा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी मोठी कारवाई करत, कर्तव्यात हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल भाग्यनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अंमलदारांना तत्काळ निलंबित केले आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री १:३० वाजेच्या सुमारास भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन गटांमध्ये भीषण हाणामारी झाली. या वादात धारदार शस्त्रांचा सर्रास वापर करण्यात आला. यामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले.
जखमींना तातडीने वजीराबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आणखी एका जखमीचा मृत्यू झाला. दुसऱ्या गंभीर जखमी व्यक्तीला पुढील उपचारासाठी विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात येत होते.
रुग्णालय परिसरातच थरार
अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, जखमीला रुग्णालयात नेत असताना रुग्णालय परिसरातच एका अज्ञात व्यक्तीने पुन्हा धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. यावेळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अपेक्षित तत्परता आणि दक्षता न दाखवल्याने हा हल्ला रोखण्यात अपयश आले. प्राथमिक चौकशीत पोलिसांच्या या बेजबाबदार वर्तणुकीवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षकांचा कारवाईचा बडगा
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ आणि मुंबई पोलीस नियम १९५६ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून खालील कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे:
१. सपोउपनि ५१३२ आनंदराव कनिराम राठोड (नेमणूक पो. स्टे. भाग्यनगर)
२. सपोउपनि ५२१५ नागेश गणपतराव वाडीयार (नेमणूक पो. स्टे. भाग्यनगर)
निरीक्षकांना नोटीस आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या घटनेप्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, विष्णुपूरी रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून तैनात असलेल्या MESCO SECURITY STAFF च्या इनचार्जवरही शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
सध्या या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ माजली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
वृत्त संकलन
प्रतिनिधी माधव वाघमारे












