प्रतिनिधी: माधव वाघमारे
नांदेड, दि. 25 फेब्रुवारी: नांदेड जिल्ह्यात येत्या 26 फेब्रुवारीपासून कडक शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू होत आहेत. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे आदेश २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेपासून १२ मार्च २०२६ रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील.
अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करत हे आदेश जारी केले आहेत. या आदेशान्वये, कोणत्याही सार्वजनिक परिसरात किंवा त्याच्या आसपास पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे किंवा आदेशात नमूद केलेली कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.
तथापि, या बंदी आदेशाला काही महत्त्वाचे अपवाद ठेवण्यात आले आहेत. हे आदेश कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी तसेच विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा यांसारख्या सामाजिक उपक्रमांना लागू होणार नाहीत. तसेच, या कालावधीत सभा, मिरवणुका, मोर्चे काढणे किंवा ध्वनीक्षेपक वाजविणे यासाठी विशेष परवानगीची आवश्यकता असेल.
पाच किंवा अधिक व्यक्ती जमण्यासाठी, मोर्चे व मिरवणुका काढण्यासाठी किंवा ध्वनीक्षेपक वाजविण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना राहतील. नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि शांतता राखण्यास मदत करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.












