नांदेड, दि. ३ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
आर्वी पंचायत समितीतील मनरेगा कामकाजासंदर्भातील प्रकरणात गटविकास अधिकारी सौ. सुनीता मरसकोल्हे यांना झालेल्या कथित नियमबाह्य अटकेविरोधात आंदोलनाची ठिणगी पडली असून, महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना–नांदेडने ४ व ५ डिसेंबर रोजी दोन दिवसांची सामूहिक रजा जाहीर केली आहे. या कालावधीत अधिकारी कोणतेही शासकीय कामकाज न करण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
संघटनेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, कोणतीही प्राथमिक चौकशी न करता, तसेच सौ. मरसकोल्हे या महिला अधिकारी असल्याने अनिवार्य प्रक्रिया न पाळता करण्यात आलेली कारवाई अन्यायकारक व मनमानी स्वरूपाची आहे. तांत्रिक प्रणालीतील त्रुटींना अधिकारी जबाबदार ठरवून गुन्हेगारासारखी वागणूक देणे हे पूर्णपणे चुकीचे असल्याचेही संघटनेने नमूद केले.
याबाबत संघटनेने राज्य सरकारला कठोर इशारा दिला आहे. मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व रोहयो मंत्री यांच्या बैठकीत समाधानकारक निर्णय न झाल्यास राज्यभर कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हा मुद्दा राज्यातील ग्रामविकास विभागात गंभीर स्वरूप धारण करू शकतो.
जाहीर करण्यात आलेल्या निवेदनावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोळोदे, प्रकल्प अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांसह इतर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या आंदोलनामुळे मनरेगा तसेच विविध ग्रामीण विकास योजनांच्या शासकीय कामकाजावर आगामी दोन दिवस मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.












