परभणी (प्रतिनिधी दिपक मठपती)
साहित्य सखा समूह, परभणी यांच्या वतीने आयोजित पहिले राज्यस्तरीय कविसंगम काव्यसंमेलन दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी उजळंबा येथील हॉटेल वसंत विलास रेस्टॉरंट येथे अत्यंत उत्साही, साहित्यिक आणि रसिक वातावरणात पार पडले.
या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मा. श्री. सुभाष पांचाळ (लोककलावंत, परभणी) हे उपस्थित होते. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक मा. श्री. प्रा. डॉ. प्रभाकर शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या संमेलनाध्यक्षपदी मा. श्री. बा. बा. कोटंबे तर कविसंमेलनाध्यक्ष म्हणून मा. श्री. प्रा. डॉ. प्रल्हाद भोपे हे होते.
या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. दत्ता शेषराव ठुबे (पाटोदकर) तसेच गंगाखेड येथील सुप्रसिद्ध कवयित्री देवकी कुलकर्णी उपस्थित होत्या. उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य सखा समूहाचे प्रमुख उध्दव परभणीकर यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक बा. बा. कोटंबे म्हणाले की, आज कवितेचा आत्मा संवादातून अधिक व्यापक होत आहे. साहित्य सखा समूहाच्या माध्यमातून कवितेचे गणगोत निर्माण होत असून नवोदित कवींना प्रेरणा देण्याचे महत्त्वाचे कार्य या समूहाकडून होत आहे.”
उद्घाटक डॉ. प्रभाकर शेळके आपल्या भाषणात म्हणाले जगण्यात टोचले, बोचले, खुपले ते सल होऊन अस्सलपणे व्यक्त झाले की कविता जन्माला येते. आपली बोलीभाषा ही समृद्ध परंपरा आहे. माय मराठीचा जागर साहित्य सखा समूह करत आहे. आपल्या गाव-शिवाराच्या मातीचे ऋण कायमचे आहे सारी मातीची लेकरं, माती होऊन जाणारं अशा भावपूर्ण शब्दांत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यानंतर कविसंमेलन अत्यंत बहारदार झाले. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. प्रल्हाद भोपे यांनी कवितेच्या सामाजिक भूमिकेवर प्रकाश टाकला. माणिक पुरी यांनी परभणी जिल्ह्यातील समृद्ध साहित्य परंपरेचा गौरवशाली इतिहास उलगडून दाखवला.
राज्याच्या विविध भागांतून आलेल्या कवींनी प्रेम, समाजभान, ग्रामीण वास्तव, स्त्रीवादी विचार, निसर्ग आणि समकालीन प्रश्नांवर आधारित कविता सादर केल्या. या कविसंमेलनात कवी मोहन कुलकर्णी, सचिन कमल गणपतराव मुळे (परभणी), विद्रोही कवी कुंदन नंदा अवधूत (मानवत), महारुद्र पोपडे (परभणी), खेलबा काळे सर (माजलगाव), गझलकारा सौ. अनुराधा वायकोस (परभणी), चंद्रकांत नरटे (धाराशिव), पिराजीपौत्र कवी दिनकर ए. गरुड (पिंगळीकर), कवयित्री सौ. दुर्गा देशमुख (परभणी), कु. बासुर्या वागतकर (नांदेड), पाराजी टेकाळे (परभणी), शिवकन्या वसंत राठोड (औंढा नागनाथ), डॉ. विजयकुमार भिकूसिंग पवार (परभणी), अशोक दिपके (परभणी), सौ. व्यंकनबाई परशुराम चेनलवाड (परभणी), लक्ष्मणसूत (वसमत), विलास जल्हारे (परभणी), दिपक मठपती (नांदेड), नितीन सूर्यवंशी (परभणी), बबन शेळके (हिंगोली), रामकिशन कांबळे (पाथरी), आबा पांचाळ (वसमत), राजकुमार नायक (परभणी), कमलाकर डुबे (परभणी), कृष्णा भालेराव (नांदेड) आदी कवींनी कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.
कवींच्या सशक्त शब्दांनी आणि प्रभावी सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कवींना भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अनुष्का हिवाळे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन पांडुरंग वागतकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विलास साखरे, कृष्णा भालेराव, आयोजक व संयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.












