नांदेड, दि. २४ फेब्रुवारी प्रतिनिधी माधव वाघमारे
प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कृषी आणि संलग्न विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. केंद्रीय नोडल अधिकारी तथा भारत सरकारच्या राजभाषा विभागाच्या संयुक्त सचिव डॉ. निधी पांडे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून दिलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करावीत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. पांडे यांनी कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, रेशीम, जलसंधारण, सिंचन, उद्योग, नाबार्ड, अग्रणी बँक आदी सर्वच विभागांच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यंत्रसामुग्रीचा अभिप्राय घेण्याच्या सूचना
डॉ. पांडे यांनी कृषी विभागाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र, यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या यंत्रसामुग्रीचा नियमित अभिप्राय घेण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप्स सारख्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, असेही त्यांनी सुचवले. कृषी विभागाने तयार केलेल्या जिल्हा आराखड्यात आवश्यक त्या सुधारणा करून उद्दिष्टपूर्तीला गती द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विविध विभागांच्या कामगिरीचा लेखाजोखा
बैठकीत कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये शेतीत एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वापर, चिया व मका लागवडीस प्रोत्साहन, एक लाख जलतारा उद्दिष्ट, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप, फार्मर कपतर्फे 550 शेतकऱ्यांना तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण, महाडीबीटी अंतर्गत लाभ वितरण आणि यांत्रिकीकरण या मुद्द्यांचा समावेश होता.
याशिवाय, पशुसंवर्धन विभागाच्या लसीकरण मोहिमा आणि दूध उत्पादनवाढीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. रेशीम विभागाच्या महारेशीम अभियानाची उद्दिष्टपूर्ती आणि रेशीम शेतीच्या फायद्यांवर प्रकाश टाकण्यात आला. मत्स्यव्यवसाय विभागाने शेततळे निर्मिती व मत्स्यपालनात केलेल्या कामगिरीची माहिती दिली. जिल्हा जलसंधारण, सिंचन, कापूस संशोधन केंद्र, ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा उद्योग केंद्र यांनीही आपल्या योजनांचा आढावा सादर केला.
जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेचे काम सुरळीत सुरू असल्याचे सांगितले. पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन क्षेत्रात विशेष प्रगती होत असून या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
धनगरवाडी येथे रेशीम शेतीची पाहणी
बैठकीपूर्वी, डॉ. निधी पांडे यांनी नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथील रेशीम शेतीच्या क्षेत्राला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून रेशीम उत्पादनाच्या प्रक्रियेबाबत माहिती घेतली. प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेअंतर्गत रेशीम शेतीसाठी देण्यात येत असलेल्या केंद्र पुरस्कृत योजनांचीही त्यांनी पाहणी केली. या दौऱ्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल आणि रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.












