नांदेड |२७ जानेवारी प्रतिनिधी : माधव वाघमारे
सामाजिक चळवळी या जातीच्या चौकटीत न अडकता महापुरुषांच्या विचारांवर उभ्या राहतात. त्यामुळे त्या विचारांना कार्यकर्त्यांनी तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत पोहोचवले पाहिजे, असे आवाहन डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे यांनी केले.
डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात २७ जानेवारी रोजी कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आशोक उफाडे हे होते.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे यांच्यासह राष्ट्रीय सचिव गणेश भगत, एन. जी. पोतरे, जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे, निजामाबाद जिल्हाध्यक्ष गंगाधर गायकवाड, उपाध्यक्ष द्रोपताई कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोयणर व रमेश सूर्यवंशी, जिल्हा प्रवक्ते राजेश इंगळे, तालुकाध्यक्ष भुजंग गायकवाड, जयसिंग कांबळे, विजय भरांडे, मनोज कांबळे, ज्ञानेश्वर सोनटक्के, शिवाजी गायकवाड, ईश्वर जज जोगदंड, नामदेव वाघमारे, आनंद घाटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना सचिन साठे म्हणाले की, उपेक्षित व वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्यकर्त्यांनी संघर्ष केला पाहिजे. तेव्हाच डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचा खरा उद्देश साध्य होईल. “मी किती मोठा होतो, यापेक्षा उपेक्षित घटकांसाठी आपण काय देतो, हेच मला अधिक महत्त्वाचे वाटते,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवून राजकीय पातळीवर संघटनेची ठोस ओळख निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या प्रसंगी अध्यक्ष आशोक उफाडे, पंडित वाघमारे, द्रोपताई कांबळे, राजेश इंगळे, शिवाजी बोयणर, जयसिंग कांबळे, भुजंग गायकवाड आदी मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.












