नांदेड | दि. १४ डिसेंबर २०२५ (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई करत मध्यप्रदेशातून चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा
नांदेड यांच्या पथकाने ही कारवाई करून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एकूण ७ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून ४ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव, भाग्यनगर, वजीराबाद, भोकर, किनवट व लोहा या पोलीस ठाण्यांतील भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेला रोख व इतर साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे.
नांदेड जिल्ह्यात चोरी करणारी टोळी मध्यप्रदेशातील असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर, वरिष्ठांच्या आदेशानुसार दोन विशेष पथके तयार करण्यात आली. यापैकी एक पथक मध्यप्रदेशात सुमारे दहा दिवस तळ ठोकून तपास करत होते, तर दुसरे पथक नांदेड शहर व परिसरात संशयितांचा शोध घेत होते.
दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी रेल्वे स्टेशन नांदेड परिसरात सापळा रचून पोलिसांनी संशयित आरोपी अनिकेश गजेंद्र सिरसटिया (वय २०, व्यवसाय – बेकार, रा. मावखेडी, ता. मांगली, जि. अशोकनगर, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत एक विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींच्या अंगझडती व तपासात त्यांच्या ताब्यातून ४,०१,००० रुपये रोख मिळून आले.
चौकशीत आरोपींनी नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. हे आरोपी बँकेत पैसे काढणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवून तसेच लग्नसमारंभ व गर्दीच्या ठिकाणी संधी साधून चोरी करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. विधिसंघर्षग्रस्त बालकासह आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी अर्धापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, भोकर व मा. श्री. सूरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय तसेच त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
नांदेड पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे आंतरराज्य चोरी टोळीला मोठा दणका बसला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.












