मुंबई / २ फेब्रुवारी नांदेड (प्रतिनिधी : माधव वाघमारे)
केंद्र सरकारच्या 2026-27 या आर्थिक वर्षाच्या रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी तब्बल 23,926 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री. अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. 2009 ते 2014 या कालावधीत महाराष्ट्राला मिळणाऱ्या सरासरी 1,171 कोटींच्या तुलनेत ही तरतूद जवळपास 20 पट अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, या बजेटमध्ये देशभरासाठी जाहीर करण्यात आलेल्या 7 हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पांपैकी 2 बुलेट ट्रेन कॉरिडॉर महाराष्ट्रात असणार आहेत.
त्यामध्ये –
• मुंबई–पुणे : अवघ्या 48 मिनिटांत प्रवास
• पुणे–हैदराबाद : 1 तास 55 मिनिटांत (2 तासांच्या आत)
असा जलद प्रवास शक्य होणार आहे.
महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचा भव्य विस्तार
महाराष्ट्रात सध्या 1 लाख 70 हजार 58 कोटी रुपयांची रेल्वे कामे प्रगतीपथावर असून, यामध्ये नवीन ट्रॅक, स्थानक पुनर्विकास तसेच सुरक्षिततेशी संबंधित कामांचा समावेश आहे.
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत राज्यातील 132 स्थानकांचे संपूर्ण पुनर्विकास होणार असून, यासाठी 5,675 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे.
प्रीमियम रेल्वे सेवा आणि नेटवर्क विस्तार
राज्यात प्रवासी सुविधांमध्ये मोठी सुधारणा झाली असून –
• वंदे भारत एक्सप्रेस : 12 जोड्या
• अमृत भारत एक्सप्रेस : 5 जोड्या
या गाड्या सध्या कार्यरत आहेत.
2014 नंतर महाराष्ट्रात सुमारे 2,400 किमी नवीन रेल्वे मार्गांचे बांधकाम करण्यात आले आहे, जे मलेशियाच्या संपूर्ण रेल्वे नेटवर्कपेक्षा अधिक आहे. तसेच राज्यात 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून, 3,744 किमी मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे.
रस्ते सुरक्षेसाठी 1,228 उड्डाणपूल व भुयारी मार्ग उभारण्यात आले आहेत.
रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ‘कवच’ प्रणालीला 4,971 आरकेएमवर मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी 576 आरकेएमवर अंमलबजावणी पूर्ण, तर 3,617 आरकेएमचे काम व निविदा प्रक्रिया सुरू आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या पत्रकार परिषदेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे
केंद्रीय रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री प्रतीक गोस्वामी,
मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) श्री अवनीश कुमार पांडे,
प्रधान मुख्य अभियंता श्री रजनीश माथूर,
प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक श्री अरविंद माळखेड़े,
मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री हिरेश मीणा
यांची उपस्थिती होती.












