प्रतिनिधी – माधव वाघमारे
नांदेड, दि. 03 मार्च 2026 रोजी सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील एकूण 50 नागरिक हे विविध आखाती देशांत (गल्फ देशांत) वास्तव्यास आहेत. जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हे सर्व नागरिक पूर्णपणे सुरक्षित असून त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अनिष्ट बातमी नाही.
ज्या देशांमध्ये हे नागरिक आहेत, त्यामध्ये दुबई, शारजाह (संयुक्त अरब अमिराती), कतार, बहरीन आणि सौदी अरेबिया यांचा समावेश आहे. या ठिकाणाहून मिळालेल्या वृत्तानुसार, तेथील स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासाच्या माध्यमातूनही त्यांच्याशी नियमित संपर्क ठेवण्यात येत असल्याचे समजते.
गेल्या काही दिवसांपासून आखाती प्रदेशातील हवामानात बदल व इतर कारणांमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाकडून नांदेडकर नागरिकांची चौकशी सुरू होती. आज सायंकाळी उशिरापर्यंत झालेल्या पडताळणीत हे सर्व ५० जण सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये आणि आपल्या आप्तेष्टांच्या सुरक्षिततेबाबत शंका असल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. जिल्ह्यातून आखाती देशांमध्ये गेलेल्या इतर कोणत्याही नागरिकांबाबत माहिती मिळताच ती त्वरित जनतेपर्यंत पोहोचवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.











