नांदेड : २० जानेवारी (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणारे, शांतता भंग करणारे व कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात नांदेड पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. पोलीस अधीक्षक मा. श्री अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या नांदेड सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी शहरातील विविध भागात विशेष कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक मा. श्री सूरज गुरव यांच्या सूचनेनुसार पथकप्रमुख सपोनि श्री भागवत नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील संवेदनशील व सार्वजनिक ठिकाणी पेट्रोलिंग करण्यात आली.
विविध पोलीस ठाण्यांतर्गत झालेली कारवाई
१) पोलीस स्टेशन भाग्यनगर
छत्रपती चौक व किनवट वाईन शॉप परिसरात पेट्रोलिंगदरम्यान सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या २ इसमांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर कलम 110/117 म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच परिसरातील दारूची दुकाने, वाईन शॉप व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.
२) पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण
एम.आय.डी.सी. ढवळे कॉर्नर परिसरात पेट्रोलिंग करताना सार्वजनिक शांतता भंग करणारे ४ इसम आढळून आले. त्यांच्यावरही कलम 110/117 म.पो.का. अंतर्गत कारवाई करण्यात आली. संबंधित दारू दुकाने व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.
३) पोलीस स्टेशन विमानतळ
माळटेकडी परिसरात पेट्रोलिंगदरम्यान सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणारे २ इसम आढळून आले. त्यांच्यावर कलम 110/117 म.पो.का. प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली. तसेच परिसरातील वाईन शॉप व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.
४) दामिनी पथक
दामिनी पथकाने विसावा गार्डन, बाबानगर परिसरात पेट्रोलिंग करताना ५ इसमांवर सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी कारवाई केली. सदर इसमांवर पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे कलम 110/117 म.पो.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांचा इशारा
पोलीस अधीक्षक मा. श्री अबिनाश कुमार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नांदेड शहरातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे किंवा सार्वजनिक शांतता भंग करणे खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारात सहभागी असणाऱ्यांविरोधात यापुढेही कडक व कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
नांदेड पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होणार आहे.












