नांदेड, दि. २३ (प्रतिनिधी: माधव वाघमारे): “स्वच्छता हाच खरा देव” या राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी, त्यांच्या जयंतीनिमित्त आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे नेतृत्व महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी केले असून, त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन चैतन्य नगर परिसरात स्वच्छता करत नागरिकांना आदर्श उदाहरण घालून दिले.
गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या विशेष मोहिमेंतर्गत महापौरांनी सकाळी चैतन्य नगर परिसरातील प्रमुख रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांना भेट देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी केली आणि कर्मचाऱ्यांसमवेत थेट सफाई कार्यात सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या सोबत महापौर प्रतिनिधी संतोष मुळे, नगरसेवक सतीश देशमुख, सहाय्यक आयुक्त मोहम्मद गुलाम सादिक तसेच मनपाचे विविध अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना महापौर सौ. कविता मुळे म्हणाल्या, “राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी आयुष्यभर सामाजिक प्रबोधनासोबतच स्वच्छतेवर भर दिला. त्यांनी दाखवलेला हा मार्ग आपण सर्वांनी अंगिकारला पाहिजे. केवळ जयंतीच्या दिवशीच नव्हे, तर प्रत्येक दिवस आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी समर्पित असायला हवा. स्वच्छतेमुळेच निरोगी समाजाची निर्मिती होते.”
कार्यक्रमाच्या शेवटी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र योगदान देणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महापौरांच्या हस्ते या कर्मवीरांचा गौरव करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व इतर साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करताना महापौरांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
याचबरोबर शहरातील इतर प्रभागांतही नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत साचलेला कचरा उठवणे, नाल्यांची स्वच्छता करणे आणि रस्त्यांवरील घाण दूर करण्यात आली. यानिमित्ताने महानगरपालिकेने नागरिकांना कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देत घरगुती कचरा ओला व सुका असा वेगळा करून देण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी घाण न करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून नागरिकांना स्वच्छतेची शपथ दिली गेली, तर आभार स्वच्छता निरीक्षक यांनी मानले. या उपक्रमामुळे परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती झाली असून, नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे












