कुंटूर (प्रतिनिधी माधव वाघमारे):
नांदेड जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली असून, कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदीपात्रातून तब्बल १ कोटी ७० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास उप विभागीय पोलीस अधिकारी, बिलोली यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे इज्जतगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात बोटीच्या सहाय्याने अवैध वाळूचे उत्खनन सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मध्यरात्री २:०० वाजेच्या सुमारास मारोती डोईफोडे (उपसरपंच) यांच्या विटभट्टीजनजीक छापा टाकला.
या कारवाईत घटनास्थळावरून वाळूने भरलेले हायवा ट्रक्स, जेसीबी आणि वाळू उपसा करणारी मोठी फायबर बोट मिळून आली. जप्त करण्यात आलेल्या बोटी अत्यंत वजनदार असल्याने त्या जागेवरून हलवणे शक्य नव्हते, त्यामुळे पोलिसांनी जिलेटिनच्या साहाय्याने त्या जागीच नष्ट केल्या आहेत.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
पोलीस पथकाने कारवाई दरम्यान खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
- तीन हायवा ट्रक्स: (MH-26-B-9929, MH-26-CH-2065, MH-43-BP-1057) – एकूण किंमत ९० लाख ३५ हजार रुपये.
- जेसीबी मशीन: एक भगव्या रंगाची चैनचा जेसीबी – किंमत ५० लाख रुपये.
- फायबर बोटी: एक मोठी फायबर बोट व एक लहान इंजिन बोट – एकूण किंमत ३० लाख रुपये.
- वाळू: ८ ब्रास काळी वाळू – किंमत ४० हजार रुपये.
एकूण जप्त मुद्देमाल: १,७०,७५,०००/- रुपये.
९ जणांवर गुन्हे दाखल
या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०३(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये नवनाथ चेलकेवाड, सोनाजी हेंडगे, भानुदास हंडेवार, साईनाथ पांडे, कैलास शिंदे, विठ्ठल शिंदे, साईनाथ चिलमवाड, मारोती डोईफोडे आणि ज्ञानेश्वर पांडुर्णे यांच्यासह इतर तीन जणांचा समावेश आहे.
कारवाई करणारे पथक:
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. श्याम पानेगावकर, कुंटूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विशाल भोसले, पोलीस उपनिरीक्षक सुनील जाधव, गजानन तोटेवाड आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या पथकाचे अभिनंदन केले असून, भविष्यातही वाळू माफियांविरुद्ध अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.












