नांदेड |२२ एप्रिल प्रतिनिधी: माधव वाघमारे
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) आपली कार्यतत्परता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. परभणी आणि छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये आरपीएफने रेल्वे मालमत्ता चोरणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत, तर दुसऱ्या घटनेत एका हरवलेल्या अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करून तिला पालकांच्या स्वाधीन केले आहे.
रेल्वे यार्डात चोरीचा प्रयत्न उधळला; ५२ किलो साहित्य जप्त
‘ऑपरेशन रेल सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत २० एप्रिल २०२६ रोजी परभणी रेल्वे स्थानक परिसरात आरपीएफने धडक कारवाई केली. सकाळी ११:१५ च्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल वावळे आणि हेड कॉन्स्टेबल महेंद्रसिंग चव्हाण हे यार्ड परिसरात गस्त घालत होते. यावेळी एका संशयित व्यक्तीची हालचाल पाहून त्यांनी त्याला ताब्यात घेतले.
तपासणी केली असता, संबंधित व्यक्तीकडे ५२ किलो वजनाच्या रेल्वे फिश प्लेट्स आणि ३ पेंड्रोल क्लिप असलेली एक मोठी पिशवी आढळली. ‘राधे’ (रा. परभणी) असे या आरोपीचे नाव असून, रेल्वे मालमत्तेबाबत विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. अखेर त्याने चोरीची कबुली दिली. याप्रकरणी परभणी आरपीएफ पोस्टमध्ये गुन्हा क्रमांक ०१/२०२६ नुसार ‘रेल्वे मालमत्ता अधिनियम १९६६’ च्या कलम ३(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑपरेशन नन्हे फरिश्ते १६ वर्षीय मुलीची आईशी भेट
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर माणुसकीचे दर्शन घडले. २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता महिला प्रतीक्षालयात एक १६ वर्षांची मुलगी एकटीच बसलेली महिला कॉन्स्टेबल छोटी पुनिया आणि जीआरपीचे हेड कॉन्स्टेबल पंकज दिघोळे यांना आढळली.
संशयास्पद स्थिती पाहून तिची विचारपूस केली असता ती घर भरकटल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तातडीने तिच्या आईशी संपर्क साधला. काही वेळातच तिची आई स्थानकावर पोहोचली. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. आपल्या मुलीला सुरक्षित पाहून मातेच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले आणि त्यांनी रेल्वे प्रशासनाचे मनापासून आभार मानले.
प्रशासनाचे आवाहन: > रेल्वे मालमत्तेचे नुकसान करणे हा गंभीर गुन्हा असून अशा कृत्यांपासून दूर राहावे. तसेच प्रवाशांनी स्थानक परिसरात संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास त्वरित आरपीएफला कळवावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.












