नांदेड १७ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे जिल्ह्यात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व समाजातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलीस दलाने व्यापक आणि निर्णायक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील सराईत व धोकादायक गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करत पोलिस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली प्रतिबंधात्मक मोहिम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर विशेष नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वारंवार गुन्हे करणारे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले तसेच समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांची सखोल नोंद (रेकॉर्ड) तयार करून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमान्वये कठोर कारवाई करण्यात येत आहे. एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गतही कारवाईचे प्रस्ताव तयार करून अंमलबजावणी सुरू आहे.
पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 55 अन्वये आतापर्यंत 46 प्रकरणांमध्ये तब्बल 135 गुन्हेगारांना नांदेड जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. तसेच एमपीडीए कायद्यांतर्गत 44 सराईत गुन्हेगारांवर कारवाईचे प्रस्ताव दाखल करण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयाने त्यावर कार्यवाही सुरू आहे. याशिवाय, कलम 56 अंतर्गत 269 प्रस्ताव व कलम 57 अंतर्गत 66 प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत 150 पेक्षा अधिक सराईत व गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवरही कडक नजर ठेवण्यात येत असून, आवश्यकतेनुसार त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी जनतेला स्पष्ट संदेश देताना सांगितले की, “कायद्यापुढे कोणीही मोठा नाही. जनतेची सुरक्षितता व सुव्यवस्था हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.”
या कठोर भूमिकेमुळे नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश बसत असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होत आहे.












