नांदेड, दि. १ जानेवारी : (प्रतिनिधी) माधव वाघमारे
दैनंदिन जीवनात घडणाऱ्या रस्ते अपघातांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होत आहे. हे अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
वाहन अपघातांना आळा बसावा तसेच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने दरवर्षी देशभर रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. याच पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा अभियान २०२६ हे १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असून, या अभियानाचा शुभारंभ आज प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे करण्यात आला.
या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले होते. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून अभियानाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी रस्ते अपघात कमी करण्यासाठी पोलीस, परिवहन, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आदी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. नांदेड जिल्ह्यात डंपर व हायवा वाहनांच्या धोकादायक वाहनचालना मुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस आणि कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नागरिकांनी वाहन चालविताना वाहतुकीचे नियम पाळून स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करत त्यांनी उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय शिवराम अहिरे यांनी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या पंचसूत्री कार्यक्रमाची माहिती दिली. मद्यपान करून वाहन न चालविणे, वेगमर्यादेचे पालन करणे, दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करणे, चारचाकी वाहनात सीट बेल्ट लावणे तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले. नांदेड जिल्ह्यात २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये रस्ते अपघातांमध्ये ५.०४ टक्के वाढ झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अपघातांमधील मृत्यूसंख्या ही अनेक गंभीर गुन्ह्यांतील मृत्यूंपेक्षा अधिक असल्याचे सांगून, नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमात ‘रस्ते की पाठशाला’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच मोटार वाहन निरीक्षक प्रदीप नन्नावरे यांनी “मी राष्ट्रीय महामार्ग बोलतोय” या विषयावर आधारित उद्बोधनात्मक गीताचे प्रकाशन केले.
या कार्यक्रमास प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राम गलधर, निवासी वैद्यकीय अधिकारी गुट्टे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, गुरू गोबिंदसिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) नांदेड येथील विद्यार्थी, विविध संघटनांचे पदाधिकारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक, वाहन वितरक तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असे एकूण २७५ नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोटार वाहन निरीक्षक श्रीमती रेणुका राठोड यांनी केले, तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित बोरकर यांनी आभार प्रदर्शन केले.












