(प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड, दि. १४ जानेवारी २०२६ भारतीय इतिहासात धर्मस्वातंत्र्य, मानवता, त्याग व बलिदान यांचे तेजस्वी प्रतीक म्हणून ओळखले जाणारे “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड शहरात २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य, ऐतिहासिक व आध्यात्मिक समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समागम केवळ धार्मिक उत्सव नसून, सेवा, समानता आणि मानवतेचा जागतिक संदेश देणारा महासोहळा ठरणार आहे.
असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुमारे ५३ एकर विस्तीर्ण मैदानावर हा भव्य समागम संपन्न होणार असून, देश-विदेशातून अंदाजे १० लाखांहून अधिक भाविक नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. विविध समाजांचा सहभाग, प्रशासनाची काटेकोर तयारी आणि स्वयंसेवकांची सेवाभावाची ऊर्जा यामुळे हा कार्यक्रम इतिहासात अजरामर ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
नऊ समाजांचा एकतेचा संदेश
या ऐतिहासिक शहीदी समागमाचे आयोजन नऊ समाजांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. राज्य शासनाचा अल्पसंख्याक विभाग, “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेगबहादूर साहिबजी ३५० वी शहीदी समागम समिती तसेच शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन संप्रदाय आणि भगत नामदेव वारकरी समाज यांनी एकत्र येत सामाजिक ऐक्याचा आदर्श उभा केला आहे. “सर्व धर्म समान, सर्व मानव समान” हा गुरूंचा संदेश या संयुक्त रचनेतून ठळकपणे अधोरेखित होतो.
मुख्य मंडप व अनवाणी चालण्याची परंपरा
कार्यक्रम स्थळी उभारण्यात येणाऱ्या मुख्य मंडपात दोन्ही दिवस श्री गुरु ग्रंथसाहिब विराजमान राहणार आहे. गुरूंच्या दर्शनासाठी येणारे सर्व भाविक, मान्यवर व अतिथी अनवाणी चालतच मुख्य मंडपाकडे प्रवेश करणार आहेत. अहंकारत्याग, नम्रता आणि गुरूचरणी समर्पण व्यक्त करणारी ही परंपरा सेवेतून भक्तीचा खरा अर्थ उलगडून दाखवणारी ठरणार आहे. याचबरोबर संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जन्मगाव नरसी नामदेव येथून वारकरी दिंड्या पायी चालत नांदेडमध्ये समागम स्थळी पोहोचणार आहेत.
श्रमदानातून साकारलेली सेवा संस्कृती
समागमाच्या पूर्वतयारीत नुकतेच जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या उपस्थितीत भव्य श्रमदान पार पडले. मैदान स्वच्छता, खडे उचलणे, भाविकांसाठी सुरक्षित मार्ग तयार करणे ही कामे प्रशासन, विद्यार्थी, स्वयंसेवक व भाविकांनी सेवाभावाने केली. “सेवा हीच खरी साधना” हा गुरूंचा संदेश या श्रमदानातून प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला.
लंगर : समानतेचा महासागर
भाविकांच्या सोयीसाठी १२ भव्य लंगर उभारण्यात येणार असून, प्रत्येक लंगरमध्ये एकावेळी सुमारे ३,००० भाविक भोजन करू शकतील. २४ व २५ जानेवारी रोजी सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत अखंड लंगर सेवा सुरू राहणार आहे. जात, धर्म, भाषा, श्रीमंती-गरिबी यांचा कोणताही भेद न ठेवता सर्वजण एकाच पंक्तीत बसून गुरूचा प्रसाद स्वीकारणार आहेत.
विनामूल्य सेवा स्टॉल व जुताघर व्यवस्था
कार्यक्रम स्थळाच्या चारही बाजूंनी दोन किलोमीटरपर्यंत चहा, पाणी, नाश्ता व फळांचे विनामूल्य सेवा स्टॉल उभारले जाणार आहेत. तसेच आठ प्रवेशद्वारांवर आठ जुताघरे उभारण्यात येणार असून, गरजेनुसार त्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. ही सेवा नम्रता, शिस्त आणि अहंकारत्यागाचा संस्कार घडवणारी आहे.
गतका व सांस्कृतिक कार्यक्रम
शीख धर्मीयांची पारंपरिक युद्धकला ‘गतका’चे प्रात्यक्षिक, शौर्य व शिस्तीचे दर्शन घडवणारे ठरणार आहे. यासोबतच नऊ समाजांच्या वतीने कीर्तन, कथा व धार्मिक प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यातून गुरूंच्या जीवनकार्याचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचेल.
वाहतूक, निवास व विशेष सुविधा
समागमासाठी दिल्ली, अमृतसर, चंदीगड, मुंबई, हैद्राबाद येथून मोफत विशेष रेल्वे सेवा तसेच दोन्ही दिवस विशेष विमानसेवा उपलब्ध असणार आहे. कार्यक्रम स्थळी १० हजार भाविकांच्या निवासासाठी सर्व सुविधायुक्त आदर्श टेन्ट सिटी उभारण्यात येणार आहे. हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करून श्रद्धेचा अभिषेक करण्यात येणार असून, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, बागेश्वरचे आचार्य, महंत व मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
सेवेतून इतिहासाचे साक्षीदार होण्याचे आवाहन
नांदेड येथे होणारा हा ३५० वा शहीदी समागम म्हणजे सेवा, समानता, बलिदान आणि मानवतेचा महासोहळा आहे. “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असून, या भव्य आयोजनातून तो संपूर्ण जगाला दिशा देणार आहे.
चला तर मग, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनूया, सेवेत सहभागी होऊया आणि गुरूंच्या चरणी आपली सेवा अर्पण करूया.












