नांदेड ११ एप्रिल प्रतिनिधी
बाळंतपण असो, अपघात असो किंवा एखादी मोठी दुर्घटना… संकटाच्या वेळी देवदूतासारखी धावून येते ती म्हणजे ‘१०२’ क्रमांकाची रुग्णवाहिका. कोरोनाच्या भीषण काळात जेव्हा रक्ताची नाती दूर पळत होती, तेव्हा हेच रुग्णवाहिका चालक आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देत होते. मात्र, इतकी महत्त्वाची सेवा बजावूनही आज १०२ रुग्णवाहिका चालकांचे आयुष्य मात्र अंधारातच आहे. त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, हा त्यांच्यावर एकप्रकारे अन्यायच असल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रत्येक संकटात ‘१०२’ सज्ज
गर्भवती मातांना दवाखान्यात नेणे, प्रसूतीनंतर त्यांना सुखरूप घरी सोडणे, कुपोषित बालकांना उपचारार्थ हलवणे, विषबाधा किंवा सर्पदंश झालेल्या रुग्णांना तातडीने मदत पोहचवणे अशा अनेक कामांसाठी १०२ रुग्णवाहिका चोवीस तास सज्ज असते. केवळ आरोग्य सेवाच नाही, तर मंत्र्यांचे दौरे, व्हीआयपी बंदोबस्त, निवडणुकीचे कामकाज, तहसील कार्यालयातील ड्युटी, दंगलीची परिस्थिती किंवा महापुरुषांच्या जयंत्यांसारखे मोठे कार्यक्रम, अशा प्रत्येक ठिकाणी १०२ रुग्णवाहिकेला पाचारण केले जाते.
वेळेवर पगार नाही, विम्याचे संरक्षण नाही
दुर्दैवाची बाब अशी की, इतकी महत्त्वाची जबाबदारी पेलणाऱ्या या वाहन चालकांना साधे हक्काचे वेतनही वेळेवर मिळत नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्या गाडीतून दररोज शेकडो रुग्ण दवाखान्यापर्यंत पोहोचतात, त्याच चालकांच्या स्वतःच्या कुटुंबासाठी कोणत्याही प्रकारची ‘मेडिकल बिल’ सवलत उपलब्ध नाही. अपघाताची भीती उराशी बाळगून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षणही देण्यात आलेले नाही.
कायमस्वरूपी नोकरीची प्रतीक्षा
अनेक वर्षांपासून हे चालक तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. आम्हाला कायमस्वरूपी कामाचा दर्जा मिळावा,ही त्यांची जुनी मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. प्रशासकीय स्तरावर केवळ आश्वासने मिळत असल्याने चालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. शासन एकीकडे आरोग्य व्यवस्था बळकट असल्याचे सांगते, मात्र या व्यवस्थेचा कणा असलेल्या वाहन चालकांचे शोषण थांबणार कधी? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
आम्ही रात्रंदिवस रुग्णांची सेवा करतो, पण आमच्या मुलाबाळांच्या भविष्याचं काय? पगार वेळेवर नाही आणि नोकरीची शाश्वती नाही. प्रशासनाने आमच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन न्याय द्यावा.
प्रतिनिधी माधव वाघमारे












