नांदेड १ एप्रिल (प्रतिनिधी माधव वाघमारे)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वार्षिक स्नेहसंमेलन ‘ज्ञानतीर्थ २०२६’ चा आज १ एप्रिल रोजी अत्यंत उत्साही वातावरणात शुभारंभ झाला. विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात आयोजित या सोहळ्याने सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांच्या पर्वाची दिमाखदार सुरुवात केली. यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यापीठ आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून नांदेड शहराचा चेहरामोहरा बदलता येईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. प्रमुख पाहुण्या म्हणून नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर कविता संतोष मुळे, तर विशेष उपस्थिती म्हणून किनवटचे आमदार भीमरावजी केराम लाभले होते. व्यासपीठावर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. बी. एस. सुरवसे, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर आणि स्नेहसंमेलनाचे प्रभारी डॉ. पृथ्वीराज तौर यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची शहराला गरज
अध्यक्षीय भाषणात डॉ. चासकर म्हणाले की, “समाजाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन पुढे येणे गरजेचे आहे. नांदेड शहरातील विविध नागरी समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी विद्यापीठ आणि महानगरपालिका यांनी एकत्रितपणे उपक्रम राबवल्यास शहराचा निश्चितच कायापालट होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्तीने पुढाकार घ्यावा.”
आदिवासी संस्कृतीचे जतन महत्त्वाचे: आ. भीमरावजी केराम
आमदार भीमरावजी केराम यांनी यावेळी किनवट भागातील आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवावर प्रकाश टाकला. हे वैभव आणि कला जोपासण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असून, त्यामध्ये विद्यापीठाची भूमिका अत्यंत मोलाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
विजेत्यांचा सत्कार
या सोहळ्यात राष्ट्रीय युवक महोत्सवात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले.
खास चौकट: युवकांनी कुटुंब, समाज व देशासाठी योगदान द्यावे – महापौर कविता मुळे
महापौर कविता मुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिक्षण केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग कुटुंब, समाज आणि देशाच्या विकासासाठी करा. भारतीय संस्कृतीत कुटुंब संस्था भक्कम असल्याशिवाय देश सुदृढ होऊ शकत नाही.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका विद्यापीठाच्या संशोधनाची आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची मदत घेण्यास सदैव कटीबद्ध आहे. विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी, पुस्तकांशी मैत्री आणि प्रश्न विचारण्याची वृत्ती जोपासावी, असे आवाहनही त्यांनी केले.












