नांदेड : १६ जानेवारी (दिपक मठपती)
नांदेड शहरातील विकासकामांचे खरे चित्र समाजमाध्यमांच्या माध्यमातून निर्भीडपणे जनतेसमोर मांडणाऱ्या युवा पत्रकार मुक्ता कदम यांच्या कार्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. ‘राजमुद्रा’ या व्यासपीठावर झालेल्या त्यांच्या सविस्तर मुलाखतीतून नांदेड शहरातील विविध मूलभूत प्रश्नांवर त्यांनी परखड आणि ठाम भूमिका मांडली आहे.
मुक्ता कदम या मूळच्या माहूर, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून सध्या पुणे येथे वास्तव्यास आहेत. मात्र नांदेड हे आपले होम टाऊन असल्याने शहराच्या विकासाबाबतची वस्तुस्थिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या स्वतः शहरातील विविध भागात प्रत्यक्ष फिरून रस्ते, नाले, शाळा, सार्वजनिक स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेत असून, त्या संदर्भातील व्हिडिओ यूट्यूब व समाजमाध्यमांवर प्रसारित करत आहेत.
कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन किंवा विरोध न करता केवळ जनतेचे प्रश्न समोर आणणे, हाच आपला उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. शासन व प्रशासनाने या मुद्द्यांकडे गांभीर्याने पाहून सुधारणा कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मुलाखतीदरम्यान त्यांनी मल्टीपर्पज शाळेतील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न, जिल्हा परिषद शाळांची दयनीय अवस्था तसेच शाळांच्या जागा बिल्डरकडे जाण्याबाबत निर्माण होत असलेल्या भीतीकडे लक्ष वेधले. नांदेड विमानतळाच्या विकासाबाबत बोलताना विमानतळ शहराबाहेर असणे गरजेचे असतानाही सध्याच्या रचनेमुळे नागपूर, भोकर व हिंगोलीकडे जाणाऱ्या नागरिकांचे अंतर तब्बल पाच किलोमीटरने वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
शहरातील अस्वच्छता, सांडपाणी व्यवस्थेचा अभाव, ड्रेनेज लाईन्सची अपूर्ण कामे, शिवाजीनगर परिसरातील वाहतूक कोंडी, तसेच अनेक ठिकाणी रस्ते व नाल्यांची कामे एकाच वेळी सुरू असल्यामुळे नागरिकांना होत असलेला प्रचंड त्रास त्यांनी अधोरेखित केला. एक काम पूर्ण झाल्यानंतरच दुसरे काम सुरू करावे, अशी जनतेची भावना त्यांनी मांडली.
सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांदरम्यान दुभाजक काढल्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निर्भीड पत्रकारिता, प्रत्यक्ष निरीक्षण आणि वास्तव मांडण्याची पद्धत यामुळे मुक्ता कदम यांच्या कार्याला समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
नांदेडच्या विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांची वस्तुस्थिती समोर आणत त्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना आत्मपरीक्षण करण्याची संधी दिली असून, त्यांची ही भूमिका नागरिकांमध्ये कौतुकास्पद ठरत आहे.












