नांदेड २७ मार्च प्रतिनिधी माधव वाघमारे
“जनगणना हे केवळ आकडेवारी संकलन नसून ते एक अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन याच डेटावर अवलंबून असते. त्यामुळे या प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येक स्तरावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणतीही चूक न करता आपली जबाबदारी चोख पार पाडावी,” असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले.
कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आयोजित ‘जनगणना २०२७’ च्या तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश
या कार्यशाळेत जनगणना संचालनालयाचे सहायक संचालक वीरेंद्र दीक्षित, सांख्यिकी अधिकारी मयूर पवार व नेहाल धुरंधरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जनगणनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, प्रत्यक्ष प्रक्रिया आणि तांत्रिक संकल्पनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पहिल्या टप्प्यात होणारी ‘घरयादी’ आणि त्यासोबत विचारले जाणारे ३४ महत्त्वाचे मुद्दे यावर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सखोल चर्चा करण्यात आली.
जनगणनेचे दोन टप्पे आणि वेळापत्रक
निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी यावेळी जनगणनेच्या स्वरूपावर प्रकाश टाकला. ही प्रक्रिया प्रामुख्याने दोन टप्प्यांत विभागली गेली आहे: टप्पा कालावधी स्वरूप टप्पा १ १६ मे ते १५ जून २०२६ घरयादी तयार करणे आणि घरांची गणना. टप्पा २ – प्रत्यक्ष लोकसंख्या गणना. विशेष आकर्षण: ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) यंदाच्या जनगणनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर. प्रशासनाने नागरिकांसाठी स्व-गणनेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
- कालावधी: १ मे ते १५ मे २०२६.
- पद्धत: नागरिक स्वतःच्या मोबाईलवरून ठराविक संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती भरू शकतील.
- फायदा: यामुळे प्रगणकांचा वेळ वाचेल आणि माहिती अधिक अचूक राहण्यास मदत होईल.
प्रशासकीय उपस्थिती
या कार्यशाळेला सहायक जिल्हाधिकारी झेनितचंद्र र दोनतुला, अनन्या रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, मनपा उपायुक्त अभिजीत वायकोस, तहसीलदार विपीन पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, चार्ज अधिकारी तथा तहसीलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाचे आवाहन:
डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होणाऱ्या या ऐतिहासिक प्रक्रियेत नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची अचूक माहिती देऊन राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे.












