मुंबई | प्रतिनिधी
नांदेड 28 जानेवारी माधव वाघमारे
महाराष्ट्रात एक कथित सरकारी “वायरलेस मेसेज” सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामुळे प्रशासकीय व राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या संदेशात उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या निधनाचा दावा करण्यात आला असून, त्यानंतर तीन दिवसांचा राजकीय शोक, राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकावणे आणि राज्यातील सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचे निर्देश दिल्याचे नमूद आहे.
हा संदेश सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई येथून जारी झाल्याचा भास निर्माण करण्यात आला आहे. तसेच “अंडर सेक्रेटरी, प्रोटोकॉल सेक्शन” यांच्या नावाने तो पाठवण्यात आल्याचे दाखवण्यात आले असून, मुख्य सचिव, राज्यपाल सचिवालय, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संबोधित असल्याचे दिसते.
विशेष म्हणजे, या कथित संदेशात 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाल्याचा उल्लेख आहे आणि त्याच दिवशी राज्यभर कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याचे नमूद आहे. मात्र हा संदेश अधिकृत सरकारी संकेतस्थळांवर, मान्यताप्राप्त वृत्तसंस्था किंवा शासनाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवर कुठेही प्रकाशित झालेला नाही.
प्रशासनाशी संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या घोषणा केवळ अधिकृत राजपत्र, शासन निर्णय (GR) किंवा अधिकृत पत्रकार परिषदेद्वारे केल्या जातात. त्यामुळे कोणतीही अधिकृत पुष्टी नसताना अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, या व्हायरल दस्तऐवजामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, अफवा पसरवण्याचा हा प्रकार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून लवकरच याबाबत अधिकृत स्पष्टीकरण अपेक्षित आहे.
नागरिकांना आवाहन
कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची अधिकृत स्त्रोतांकडून खात्री करून घ्यावी. अप्रमाणित व असत्य संदेश शेअर केल्यास कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागू शकते, असेही तज्ज्ञांचे मत आहे.












