विशेष प्रतिनिधी : माधव वाघमारे
नांदेड ३१ जुलै प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने (स्वारातीम) राष्ट्रीय स्तरावर आपल्या यशाचा झेंडा फडकवत ‘राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग’ (National Green University Ranking – NGUR) २०२६ मध्ये देशात १२ वा क्रमांक पटकावला आहे. ‘ग्रीन मेंटर्स’ या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत १०० पैकी ९२.५ गुण मिळवत विद्यापीठाने ‘गोल्ड रेटिंग’ प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील सार्वजनिक अकृषिक विद्यापीठांच्या श्रेणीत ही कामगिरी करणारे स्वारातीम विद्यापीठ हे एकमेव अकृषिक विद्यापीठ ठरले आहे.
देशभरातील आयआयटी (IIT), एनआयटी (NIT), ट्रिपल आयटी (IIIT) आणि प्रमुख केंद्रीय विद्यापीठांच्या तीव्र स्पर्धेत मराठवाड्याच्या या विद्यापीठाने मारलेली ही मजल अत्यंत अभिमानास्पद मानली जात आहे. या घवघवीत यशामुळे विद्यापीठाला न्यूयॉर्क येथे आयोजित होणाऱ्या ‘10th NYC Green School Conference 2026’ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्याचे विशेष निमंत्रणही मिळाले आहे.
१० प्रमुख स्तंभांवर झाले मूल्यमापन
‘राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग’चे मूल्यमापन केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित न ठेवता पुराव्यांवर आधारित आणि सर्वांगीण पद्धतीने करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने:
- पर्यावरणीय प्रशासन (Sustainability Governance)
- जैवविविधता व Carbon & Climate Action
- Green Infrastructure आणि ऊर्जाक्षमता
- संशोधन आणि पर्यावरणीय अभ्यासक्रम
- जलव्यवस्थापन व कचराव्यवस्थापन (Circular Economy)
- शाश्वत वाहतूक आणि सामुदायिक सहभाग
या १० प्रमुख निकषांवर कठोर तपासणी करून स्वारातीम विद्यापीठाला ९२.५ गुण देत ‘Gold Rating’ प्रदान करण्यात आले.
विद्यापीठाची उल्लेखनीय हरित वैशिष्ट्ये
- सौर ऊर्जा: परिसरात २८७ KWH क्षमतेचे सौर पॅनेल्स कार्यान्वित असून त्याद्वारे विद्यापीठाची ४०% वीज गरज भागवली जाते.
- हरित परिसर: ५५० एकरांचा विस्तृत परिसर, ३५ हजार वृक्षांची लागवड, १० हेक्टरवर Biodiversity Park आणि ४ हेक्टरवर Botanical Garden.
- जल व कचरा संवर्धन: रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली, कचऱ्याचे शाश्वत पृथक्करण व पुनर्वापर.
- शैक्षणिक उपक्रम: अभ्यासक्रमात SDG-संरेखित विषयांचा समावेश आणि Green Technology वर विशेष संशोधन.
“उत्कृष्टता आणि टिकाऊपणा हेच आमचे ध्येय” – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर
विद्यापीठाच्या या ऐतिहासिक यशावर आनंद व्यक्त करताना कुलगुरू डॉ. मनोहर चासकर म्हणाले, “उत्कृष्टता आणि टिकाऊपणा हे हातात हात घालून चालतात, हेच विद्यापीठाने सिद्ध केले आहे. हे यश संपूर्ण विद्यापीठ परिवाराच्या अथक परिश्रमाचे फलित आहे. भविष्यात १०० टक्के हरित ऊर्जा आणि Net-Zero चे ध्येय गाठण्यासाठी विद्यापीठ अधिक ठोस पावले उचलणार आहे.”
सांघिक प्रयत्नांची मोलाची पावती
या यशामध्ये कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर डी. पवार, IQAC संचालक व NGUR नोडल अधिकारी डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी, समन्वयक डॉ. अविनाश कदम, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, संचालक डॉ. शैलेश वाढेर, कार्यकारी अभियंता तानाजी हुसेकर, सहा. कुलसचिव रामदास पेदेवाड आणि उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान राहिले.
तसेच विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि माजी कुलसचिव सर्जेराव शिंदे यांनी रचलेला पायाभूत पाया या प्रवासात अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. या कामगिरीबद्दल अधिसभा, व्यवस्थापन परिषद आणि विद्यापरिषदेच्या सर्व सदस्यांनी संपूर्ण विद्यापीठ परिवाराचे कौतुक केले आहे.












