नांदेड ३१ जुलै (प्रतिनिधी माधव वाघमारे)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावरील ‘राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग’ (NGUR) २०२६ मध्ये ९२.५ गुणांसह ‘गोल्ड रेटिंग’ मिळवत देशात १२ वा क्रमांक पटकावला आहे. ‘ग्रीन मेंटर्स’ या संस्थेमार्फत राबवण्यात आलेल्या या क्रमवारीत देशातील आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आय टी व केंद्रीय विद्यापीठांशी स्पर्धा करत विद्यापीठाने हे दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील सार्वजनिक अकृषिक विद्यापीठांच्या श्रेणीत या यादीत स्थान मिळवणारे स्वारातीम विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ ठरले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यापीठाला न्यूयॉर्क येथे होणाऱ्या ‘10th NYC Green School Conference 2026’ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
१० प्रमुख स्तंभांवर कठोर मूल्यांकन
विद्यापीठाचे मूल्यांकन केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित न ठेवता पर्यावरणीय प्रशासन (Sustainability Governance), जैवविविधता, Carbon & Climate Action, Green Infrastructure व ऊर्जाक्षमता, संशोधन, जलव्यवस्थापन, शाश्वत वाहतूक, कचराव्यवस्थापन व Circular Economy आणि सामुदायिक सहभाग या १० प्रमुख घटकांच्या आधारे करण्यात आले. ९० ते ९४.९९ गुणांच्या श्रेणीत हे विद्यापीठ ९२.५ गुण मिळवून ‘Gold Rating’ चे मानकरी ठरले.
विद्यापीठाचे प्रमुख पर्यावरणपूरक उपक्रम:
- सौर ऊर्जा: परिसरात २८७ KWH क्षमतेचे सौर पॅनेल्स बसवले असून विद्यापीठाची ४०% वीज गरज याद्वारे भागवली जाते.
- जैवविविधता व हरित परिसर: ५५० एकरांचा हरित परिसर, सुमारे ३५ हजार वृक्ष, १० हेक्टरवर Biodiversity Park आणि ४ हेक्टरवर Botanical Garden.
- जल व कचरा संवर्धन: Rain Water Harvesting प्रणाली, कचऱ्याचे शाश्वत पृथक्करण व पुनर्वापर.
- संशोधन व अभ्यासक्रम: SDG-संरेखित विषय, Green Technology वर संशोधन प्रकल्प व पर्यावरण अभ्यासक्रमांचा समावेश.
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांचे वक्तव्य
“उत्कृष्टता आणि शाश्वतता (Sustainability) या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात, हे विद्यापीठाने सिद्ध केले आहे. हे यश संपूर्ण विद्यापीठ परिवाराच्या अथक परिश्रमांचे फलित आहे. येत्या काळात १०० टक्के हरित ऊर्जा आणि Net-Zero चे उद्दिष्ट गाठण्यासाठी विद्यापीठ अधिक ठोस पावले उचलणार आहे,” असा विश्वास कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केला.
सामूहिक प्रयत्नांचे फलित
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या नेतृत्वाखाली प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर डी. पवार, IQAC संचालक व नोडल अधिकारी डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी, समन्वयक डॉ. अविनाश कदम, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ. शैलेश वाढेर, तानाजी हुसेकर, रामदास पेदेवाड आणि उद्यान विभागाच्या पथकाने यात मोलाचे योगदान दिले. तसेच माजी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले व माजी कुलसचिव सर्जेराव शिंदे यांनी रचलेल्या भक्कम पायाभरणीचाही यात मोठा वाटा राहिला आहे.
विद्यापीठाच्या या अभूतपूर्व यशाबद्दल अधिसभा, व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेच्या सदस्यांसह शैक्षणिक व प्रशासकीय वर्गातून सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.












