विशेष प्रतिनिधी: माधव वाघमारे नांदेड
४ जुलै मंगळवार
दक्षिण मध्य रेल्वे मुख्यालयाच्या निर्देशानुसार नांदेड रेल्वे विभागात विनातिकीट प्रवाशांवर वचक बसवण्यासाठी आणि प्रामाणिकपणे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर व आरामदायी व्हावा, या उद्देशाने ३ ऑगस्ट २०२६ रोजी व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. या एकाच दिवसाच्या मोहिमेत तब्बल १,०८७ नियमबाह्य प्रकरणे उघडकीस आली असून, दोषी प्रवाशांकडून ₹५,९८,३३५ रुपयांचा महसूल दंड स्वरूपात वसूल करण्यात आला आहे.
पहाटे साडेचारपासून ३२ पथकांचा गनिमी कावा!
३ ऑगस्ट रोजी पहाटे ४:३० वाजल्यापासून ते सायंकाळी ७:३० वाजेपर्यंत ही धडक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत मुख्य रेल्वे मार्गांवर अत्यंत गुप्तता व नियोजनबद्ध पद्धतीने तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रमुख मार्गांचा समावेश होता:
- हजूर साहिब नांदेड ते आदिलाबाद
- हजूर साहिब नांदेड – परभणी – जालना – छत्रपती संभाजीनगर ते मनमाड
- परभणी ते परळी वैजनाथ
- पूर्णा ते अकोला
या मोहिमेत ३२ तिकीट चेकिंग स्क्वॉड कर्मचारी, १४९ तिकीट तपासणी कर्मचारी, १४ स्टेशन तपासणी कर्मचारी, ४ विभागीय वाणिज्य निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा बलाचे (RPF) ३ जवान अशा एकूण भव्य ताफ्याने सहभाग घेतला. या कालावधीत २९ गाड्यांची सखोल तपासणी करण्यात आली.
कारवाई आणि वसुलीचा सविस्तर तपशील:
एका दिवसात आढळलेल्या १,०८७ प्रकरणांचा तपशील खालीलप्रमाणे आहे: उल्लंघनाचा प्रकारप्रकरणांची संख्यावसूल झालेला महसूल / दंड विनातिकीट प्रवास (TWT)५१६₹४,०४,५९० अनियमित प्रवास (IRT)१५७₹१,१७,३१० बुक न केलेले सामान (UBL)४१४₹७६,४३५ एकूण१,०८७₹५,९८,३३५
फेरीवाले आणि अस्वच्छता पसरवणाऱ्यांनाही दणका
तिकीट तपासणीव्यतिरिक्त रेल्वे आवारात व गाड्यांमध्ये अनधिकृतपणे विक्री करणाऱ्या ५ फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून ₹१०,००० चा दंड वसूल करण्यात आला. तसेच रेल्वे परिसर अस्वच्छ करणाऱ्या (लिटरिंग) ४ जणांवर कारवाई करत ₹१,१०० चा दंड आकारण्यात आला. मात्र, या मोहिमेदरम्यान धूम्रपानाचे एकही उल्लंघन आढळून आले नाही.
‘जन विश्वास अधिनियमा’बाबत समुपदेशन
या धडक मोहिमेदरम्यान केवळ कारवाईच केली गेली नाही, तर प्रवासी आणि स्टॉलधारकांना ‘जन विश्वास अधिनियमा’च्या प्रमुख तरतुदींची माहिती देऊन त्यांचे समुपदेशन करण्यात आले. रेल्वे प्रशासन आणि सामान्य जनतेमध्ये सहकार्याचे व सकारात्मक संबंध निर्माण व्हावेत, यासाठी हे जनजागृतीचे पाऊल उचलण्यात आले.
रेल्वे प्रशासनाचे आवाहन: “विनातिकीट प्रवासामुळे प्रामाणिक प्रवाशांची गैरसोय होते. रेल्वेचा महसूल जपण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, शिस्तबद्ध व आरामदायी करण्यासाठी नांदेड विभागात अशा प्रकारच्या धडक तपासणी मोहिमा पुढेही अविरतपणे राबवल्या जातील. त्यामुळे सर्व प्रवाशांनी वैध तिकीट व योग्य कागदपत्रे सोबत बाळगूनच प्रवास करावा.” — दक्षिण मध्य रेल्वे (नांदेड विभाग)












