नांदेड ३० मार्च प्रतिनिधी
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याची पहिली वचनपूर्ती आज करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते सोमवारी कौठा येथील २४×७ पाणीपुरवठा योजना, नवीन स्वच्छता वाहने आणि ७४ ऑनलाईन सेवांचा दिमाखदार शुभारंभ संपन्न झाला.
कौठ्यात आता २४ तास पाणी!
शहरातील कौठा भागातील रवि नगर येथे ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत २४×७ पाणीपुरवठा प्रायोगिक तत्त्वावर (Pilot Project) सुरू करण्यात आला आहे. यासाठी २ कि.मी.ची नवीन जलवाहिनी टाकण्यात आली असून १४१४ मालमत्ताधारकांना ‘अल्ट्रासॉनिक वॉटर एएमआर मीटर’ बसवण्यात आले आहेत. “नांदेडला स्मार्ट सिटीकडे नेण्यासाठी शुद्ध आणि निरंतर पाणीपुरवठा हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असे प्रतिपादन खासदार अशोकराव चव्हाण यांनी यावेळी केले. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण शहरात ही योजना राबवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वच्छतेसाठी ‘हायटेक’ यंत्रणा
शहराच्या आरोग्यासाठी पालिकेच्या ताफ्यात ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.०’ अंतर्गत अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत. यामध्ये रस्ते स्वच्छतेसाठी दोन स्विपिंग मशीन्स आणि मॅनहोल व ड्रेनेज लाईनच्या स्वच्छतेसाठी ‘जेटिंग कम सक्शन’ मशीनचा समावेश आहे. या आधुनिक यंत्रसामग्रीमुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन शहराची स्वच्छता अधिक वेगाने होणार आहे.
प्रशासन आता घरापर्यंत: ७४ ऑनलाईन सेवा सुरू
नागरिकांना पालिकेच्या चकरा मारण्यापासून मुक्ती मिळावी यासाठी ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम’ (RTS) अंतर्गत ७४ सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. यासाठी ‘अविरत कक्षा’चे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, 7888280000 या व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांकावरूनही नागरिक या सेवांचा लाभ घेऊ शकणार आहेत. भविष्यात शासनाच्या इतर विभागांच्या सेवाही या केंद्रातून देण्याचे नियोजन असल्याचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला महापौर तथा भाजपा महानगरप्रमुख अमरनाथ राजूरकर, सौ. कविता संतोष मुळे, उपमहापौर दीपसिंग रावत, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे, स्थायी समिती सभापती वीरेंद्रसिंग गाडीवाले, आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह सर्व समिती सभापती, नगरसेवक आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा प्रकल्प केवळ नळातून पाणी येण्यापुरता मर्यादित नसून नांदेडकरांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणारा क्रांतिकारी टप्पा आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा
डॉ. महेशकुमार डोईफोडे, पालिका आयुक्त
वृत्त संकलन:
प्रतिनिधी: माधव वाघमारे












