नांदेड ३० जून प्रतिनिधी
नागरिकांच्या तक्रारी समजावून घेऊन त्यांचा जलद निपटारा करणे, पोलीस आणि जनता यांच्यातील संवाद वाढवणे आणि लोकाभिमुख कामकाजाद्वारे जनतेचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणे, या उदात्त उद्देशाने नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) श्री शहाजी उमाप यांनी परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत ‘जनसंवाद’ हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून नांदेडमध्ये थेट जनतेच्या तक्रारी ऐकून घेत त्वरित कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
मासिक आढाव्यानंतर थेट जनतेच्या दरबारात
मिळालेल्या माहितीनुसार, परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक दर महिन्याला जिल्हा मुख्यालयांना भेटी देत असतात. याच अनुषंगाने दिनांक ३० जून २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे जिल्हा पोलिसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यात आला. हा आढावा संपल्यानंतर दुपारी ०३:०० ते ०५:०० या वेळेत पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी स्वतः जिल्ह्यातील तक्रारदारांशी थेट ‘संवाद’ साधला.
३९ तक्रारदारांचे अर्ज प्राप्त संवेदना’ पोर्टलवरून होणार थेट ट्रॅकिंग
या जनसंवाद उपक्रमादरम्यान जिल्ह्यातील एकूण ३९ तक्रारदारांनी उपस्थित राहून आपले लेखी अर्ज पोलीस उपमहानिरीक्षकांकडे सुपूर्द केले. यामध्ये प्रामुख्याने:
- मालमत्ता विषयक वाद
- हरवलेले इसम
- मारहाणीच्या घटना
- सायबर फसवणूक
- दाखल गुन्ह्यांचा संथ गतीने चाललेला तपास
या व इतर विविध गंभीर तक्रारींचा समावेश होता. प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची अत्यंत गांभीर्याने दखल घेत, श्री शहाजी उमाप यांनी त्यांच्या शीघ्र सोडवणुकीसाठी उपस्थित संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना जागेवरच आवश्यक त्या सूचना दिल्या.
तक्रारदारांच्या अर्जांचे जलद निवारण व्हावे यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ‘संवेदना’ ही विशेष तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे. आज प्राप्त झालेले सर्व अर्ज तातडीने ‘संवेदना’ पोर्टलच्या माध्यमातून पुढील चौकशी व कायदेशीर कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक तक्रारीवर काय कारवाई झाली, याचा सविस्तर आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील विशेष ‘फीडबॅक टीम’मार्फत घेतला जाणार आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती
या जनसंवाद व आढावा बैठकीप्रसंगी नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाच्या या थेट आणि सकारात्मक पुढाकारामुळे तक्रारदारांना मोठा दिलासा मिळाला असून, सर्वसामान्यांमधून या ‘जनसंवाद’ उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे.
विशेष वृत्त प्रतिनिधी: माधव वाघमारे












