नांदेड (विशेष बातमी प्रतिनिधी : माधव वाघमारे) नांदेड येथील उप अधिकषक भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी संगणमत करून, आर्थिक देवाणघेवाण करत बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस फेरफार मंजूर केल्याचा गंभीर आरोप टायगर ग्रुपचे नांदेड जिल्हाध्यक्ष पैलवान बाळासाहेब दगडू जाधव यांनी केला आहे. या प्रकरणी वारंवार तक्रारी व पुरावे देऊनही प्रशासनाकडून योग्य कारवाई न झाल्यामुळे, येत्या १४ ऑगस्ट २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदानावर शेकडो कार्यकर्त्यांसह बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
पैलवान बाळासाहेब जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड उप अधिकषक भूमि अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षक श्री. बळवंत विठ्ठलराव मस्के, श्री. रवि शेषराव श्रीरामे, श्री. दिनेश पुंडलीकराव कुडे, श्री. उत्तम रामजी मुरमुरे आणि श्री. शंकर गुंडोपंत सुर्यवंशी यांनी आपापसात संगणमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे न.भु.क्र. ६३६८ मधील फेरफार क्र. २९७५४ (दि. १८/०३/२०२५) व फेरफार क्र. ३००३० (दि. २७/०४/२०२५) मंजूर केले.
माहिती अधिकारांतर्गत (RTI) या दोन्ही फेरफारांची संचिका मागितली असता ती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर प्रथम अपील दाखल केल्यानंतर कागदपत्रे प्राप्त झाली, ज्यातून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले.
एकतर्फी सुनावणी आणि ‘डिसमिस इन डिफॉल्ट’चा आरोप
या प्रकरणी जमाबंदी आयुक्त, पुणे व जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड यांच्याकडे तक्रार केल्यानंतर उपोषणाची नोटीस दिली असता, प्रशासनाकडून चौकशीचे आश्वासन देऊन उपोषण न करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
मात्र, दि. २७/०७/२०२६ रोजी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड यांच्या कार्यालयाकडून पाठवण्यात आलेल्या पत्रात (जा.क्र. ३७५२/२०२६), तक्रारदारास अपिलाची कोणतीही पूर्वसूचना किंवा तारीख न देता हे प्रकरण ‘Dismiss in Default’ (गैरहजेरीमुळे एकतर्फी निकाली) काढल्याचे कळवण्यात आले. याशिवाय, सर्वात मोठ्या गैरव्यवहाराचा भाग असलेल्या फेरफार क्र. ३००३० चा उल्लेखच अपिलात मुद्दाम टाळण्यात आल्याचा आरोप बाळासाहेब जाधव यांनी केला आहे.
मुख्य मागण्या:
- संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करावी.
- बोगस फेरफार व भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे (FIR) दाखल करण्यात यावेत.
- बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेले फेरफार रद्द करून मूळ नोंदी पूर्ववत कराव्यात.
प्रशासनाला स्मरणपत्र आणि उपोषणाचा इशारा
टायगर ग्रुपतर्फे मा. लोकायुक्त, मुख्य सचिव, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), जमाबंदी आयुक्त पुणे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकारी नांदेड यांना स्मरणपत्र (क्र. ०१) पाठवून आंदोलनाची पूर्वसूचना देण्यात आली आहे.
“सरकारी महसुलात होणारा भ्रष्टाचार उघड करणे आणि जनतेला न्याय मिळवून देणे हा आमचा हेतू आहे. प्रशासनाने अपिलाची संधी न देता प्रकरण एकतर्फी निकाली काढून भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून आझाद मैदान, मुंबई येथे आम्ही बेमुदत आमरण उपोषणाला बसत आहोत. या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा कार्यकर्त्यांच्या जिवितास धोका निर्माण झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची असेल. पैलवान बाळासाहेब दगडू जाधव (जिल्हाध्यक्ष, टायगर ग्रुप नांदेड)












