८ ऑगस्ट प्रतिनिधी माधव वाघमारे
मुंबई: राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ देऊन शेती समृद्ध आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या पहिल्या टप्प्यात ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटी रुपयांची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट ऑनलाइन हस्तांतरित करण्यात आली. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात या लाभ वितरणाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रमुख उपस्थिती आणि डिजिटल पारदर्शकता या सोहळ्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ही योजना पूर्णपणे ऑनलाइन आणि सुलभ आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी महाआयटीच्या पोर्टलसह ग्रामपंचायत, बँक शाखा आणि सेवा संस्थांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीतील विशिष्ट क्रमांक घेऊन शेतकऱ्यांनी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा ‘ॲग्रीस्टॅक’द्वारे आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ नवीन खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश बँकांना देण्यात आले आहेत.
विभागनिहाय लाभ वाटप तपशील
- अमरावती विभाग: १,५८,१४६ शेतकरी (₹१,३७२.१७ कोटी)
- नाशिक विभाग: १,४०,०८९ शेतकरी (₹१,२०९.३९ कोटी)
- छत्रपती संभाजीनगर विभाग: १,३०,९३४ शेतकरी (₹९३२.६१ कोटी)
- पुणे विभाग: १,०४,०६१ शेतकरी (₹८६०.९७ कोटी)
- नागपूर विभाग: ७०,२९० शेतकरी (₹५४४.७१ कोटी)
- कोकण विभाग: १८,६८७ शेतकरी (₹१०८.८६ कोटी)
सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील ५३ बँकांनी सुमारे ३२ लाख कर्जखात्यांचा डेटा पोर्टलवर अपलोड केला असून ६ ऑगस्ट २०२६ पर्यंत १२.१० लाख खात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित किंवा अडचण असलेल्या प्रकरणांवर मंत्रिमंडळ उपसमितीत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.












